शिर्डीत साई संस्थान सोसायटीच्या वार्षिक सभेत साईज्योत इमारतीच्या मुद्द्यावरून तुफान खडाजंगी; सत्ताधारी-विरोधक भिडले!
विरोधकांचा गोंधळ अन् चेअरमन विठ्ठल पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर; संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडत दिला श्रद्धा-सबुरीचा संदेश!

शिर्डी प्रतिनिधी:
राज्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत साईज्योत इमारतीचे रखडलेले काम आणि शहरात नवीन जागा खरेदीच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. जुन्या संचालक मंडळातील काही सदस्य व आजी-माजी चेअरमन यांनी या विषयावर आक्षेप घेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेअरमन विठ्ठल पवार यांनी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढत संस्थेच्या ऐतिहासिक कामगिरीचा आढावा मांडला आणि विरोधकांना संयम व श्रद्धा-सबुरी राखण्याचा सल्ला दिला.
सभेत नेमकं काय घडलं?
साई संस्थान सोसायटीच्या वार्षिक सभेच्या सुरुवातीलाच साईज्योत इमारतीचा मुद्दा ऐरणीवर आला. २०१४ पासून रखडलेल्या या इमारतीचे काम अद्याप का पूर्ण झाले नाही आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या या वास्तूऐवजी संस्थेसाठी शहरात नवीन जागा घेण्याचा प्रस्ताव का मांडला जात आहे, असा सवाल माजी संचालकांनी उपस्थित केला. उर्वरित जागेत ५० लाख रुपयांत २००० स्क्वेअर फूट जागेत नवीन कार्यालय ६ महिन्यांत उभे करता येऊ शकते, असा पर्याय विरोधकांनी मांडला. तसेच ५५० सभासदांच्या स्वाक्षऱ्यांचा हवाला देत नवीन जागा खरेदीला विरोध दर्शवला.
यावर सत्ताधारी पक्षाने तात्काळ प्रत्युत्तर दिले. ५५० सह्यांचा दावा करणाऱ्या विरोधकांपैकी प्रत्यक्षात केवळ ७ ते ८ जणच विरोधासाठी विरोध करत असल्याचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधक सत्तेत असताना त्यांनी स्वतः युनियन बँकेची इमारत ११ कोटींना खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा संस्थेचे हित कुठे गेले होते, असा सवाल उपस्थित करत विरोधकांची दुटप्पी भूमिका उघडी पाडली.
चौकशी पूर्ण झाल्यावर साईज्योत इमारतीत प्रकल्प: चेअरमन विठ्ठल पवार
साईज्योत इमारतीच्या बांधकामाची २०१६ ते २०२६ दरम्यान शासकीय पातळीवर चौकशी सुरू असून कायदेशीर बाबी पूर्ण झाल्याशिवाय त्यावर कोणतेही काम करता येत नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी साई भक्तांसाठी मिनरल वॉटर (बिसलेरी) प्रकल्प आणि प्रसाद निर्मितीचा कारखाना सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे चेअरमन पवार यांनी जाहीर केले. तसेच शहरात संस्थेचे हक्काचे कार्यालय असावे यासाठी सर्वसामान्य सभासदांचे लेखी संमतीपत्र घेऊनच पारदर्शक पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थेचा पारदर्शक कारभार आणि कल्याणकारी योजना:
चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपल्या भाषणात संचालक मंडळाच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामांचा पाढा वाचला:
१. जामीनदार मुक्त कर्ज योजना: सभासदांना दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या जामीनदार मुक्त योजनेचा शेकडो कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.
२. शुद्ध गाई-म्हशीच्या दुधाचा पेढा: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) कडक निकष पाळून महिनाभर खराब न होणारा दर्जेदार पेढा भक्तांसाठी उपलब्ध केला.
३. अल्पदरात शुद्ध पाणी: साई भक्तांना अवघ्या १० रुपयांत १ लिटर आणि २० रुपयांत २ लिटर थंड पाण्याची बाटली उपलब्ध करून दिली.
४. दर्जेदार पॅकिंग पिशव्या: माजी संचालकांच्या फायद्यासाठी चालणारे पिशव्यांचे गैरव्यवहार बंद करून केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार १२० मायक्रॉनच्या पीओपी बॅगचा वापर सुरू केला.
५. सहकाराचा वारसा: पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रेरणेने आणि १९५७ मध्ये संस्था स्थापन करणाऱ्या बळीरामजी कोते पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत संस्थेचा कारभार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास:
मागील निवडणुकीत १७-० अशा ऐतिहासिक फरकाने विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून सभासदांनी नवीन संचालक मंडळाला विजयी केले होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था सभासदांच्या हिताचे निर्णय घेत राहील. केवळ राजकीय द्वेषापोटी विरोध करणाऱ्यांना कामातूनच चो उत्तर दिले जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेसाठी पोलीस बंदोबस्त:
वार्षिक सभेतील संभाव्य तणाव पाहता गलांडे साहेब, शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे साहेब, संदीप उदावंत व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार पा, व्हा. चेअरमन पोपटराव भास्करराव कोते पा. संचालक महादु बापुसाहेब कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., संभाजी शिवाजी तुरकणे पा., देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते पा., मिलींद यशवंत दुनबळे, तुळशिराम रावसाहेब पवार पा., रविंद्र बाबु गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., इकबाल फकिरमहंमद तांबोळी, सौ सुनंदा किसन जगताप पा., सौ. लता मधुकर बारसे पा., रंभाजी काशिनाथ गागरे, भाऊसाहेब भानुदास लबडे पा., सचिव विलास गोरखनाथ वाणी पा. सह सचिव बाबासाहेब शंकर अनर्थे पा., सहाय्यक सह सचिव संभाजी सोपान कोते पा व कर्मचारी वर्ग उपस्थित पत्रकारांचे आभार मानून सभेची सांगता झाली.





















