.‘श्री साई सच्चरित्रातील साईबाबांची शिकवण’ पुस्तकाचे शिर्डीत मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
साई चरित्रातील शिकवण वाचायची नाही, तर जगायची – श्री रवींद्र जोशी लिखित पुस्तकातून साईभक्तांसाठी नवा अभ्यासमार्ग
शिर्डी, दि. १८ ऑगस्ट २०२६

श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याच्या पावन वातावरणात साईभक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त साहित्यिक पर्वणी ठरलेल्या ‘श्री साई सच्चरित्रातील साईबाबांची शिकवण’ या पुस्तकाचे अनावरण व प्रकाशन श्री साईबाबा संस्थान, शिर्डीचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री शिवाजीराव भगवानराव कचरे तसेच संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री रवींद्र जोशी लिखित हे पुस्तक चाणक्य पब्लिकेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. श्री साई सच्चरित्र हा ग्रंथ केवळ वाचण्याचा नसून त्याचा अभ्यास करण्याचा आहे, या विचारातून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
श्री साई सच्चरित्रातील साईबाबांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या वागण्या-बोलण्यातून मिळणाऱ्या शिकवणी, भक्तांना दिलेले मार्गदर्शन आणि त्यामागील आध्यात्मिक संदेश समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. साईबाबांनी दिलेली शिकवण केवळ वाचून थांबायची नसून ती आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हा या पुस्तकामागील मुख्य उद्देश आहे.
‘साई चरित्रातील शिकवण वाचायची नसून जगायची आहे’ हा अत्यंत महत्त्वपूर्ण विचार या पुस्तकातून साईभक्तांसमोर मांडण्यात आला आहे. श्री साई सच्चरित्राच्या सर्व ५३ अध्यायांमध्ये आलेली साईबाबांची शिकवण एका पुस्तकाच्या माध्यमातून एकत्रितपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे साईभक्तांना साई चरित्रातील विविध प्रसंगांमधून बाबांनी दिलेला संदेश अधिक सुलभपणे समजून घेता येणार आहे.
साईबाबांचे जीवन, त्यांचे विचार, भक्तांवरील कृपा, श्रद्धा आणि सबुरीचा संदेश, सदाचार, सेवा, दया, समता आणि ईश्वरभक्ती यांसारख्या विविध मूल्यांचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे श्री साई सच्चरित्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक साईभक्तासाठी हे पुस्तक एक नवीन पर्वणी ठरणार आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तसेच श्री साई सच्चरित्र पारायण परीक्षेच्या उपक्रमाला विशेष सहकार्य करणारे साईभक्त व उद्योजक श्री भाऊसाहेब रामचंद्र चौधरी यांनी या पुस्तकाच्या तब्बल १२०० प्रती छापून साईभक्तांमध्ये वितरित केल्या आहेत. त्यांच्या या योगदानामुळे साईबाबांची शिकवण अधिकाधिक साईभक्तांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष जयश्री ताई थोरात
कैलास बापू कोते- नाट्य रसिक मंचाचे अध्यक्ष अशोक नागरे, कार्याध्यक्ष रमेश भाऊ गोंदकर, सचिव अशोक Kote बिडी साबळे सचिन तांबे, नाट्य रसिक मंचाचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील साईभक्त, मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री साई सच्चरित्र पारायणाच्या माध्यमातून साईबाबांचे चरित्र वाचण्याबरोबरच त्यातील शिकवण आत्मसात करण्याचा आणि ती जीवनात आचरणात आणण्याचा संदेश या पुस्तकातून देण्यात आला आहे. त्यामुळे ‘श्री साई सच्चरित्रातील साईबाबांची शिकवण’ हे पुस्तक साईभक्तांसाठी केवळ एक पुस्तक न राहता साईबाबांच्या शिकवणीचा अभ्यास आणि आचरण करण्यासाठीचे एक मार्गदर्शक ठरणार आहे.
साई चरित्र वाचा, साईबाबांची शिकवण समजा आणि ती आपल्या जीवनात जगा – हाच या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे.




















