ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या वेळी रुग्णांना स्वत: रुग्णालयात दाखल करुन वेळीच योग्य उपचार झाल्याने शेकडो लोकांचे प्राण वाचविणारे पुखराज पिपाडा यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा असे आवाहन भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी केले.

भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुदेव दत्त पतसंस्थेचे माजी चेअरमन पुखराजजी पिपाडा यांच्या ६५ वी कार्यक्रमानिमित्त सत्कार सोहळा गणेश परिसराच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा,बाळासाहेब गाढवे,संघपती अनिल पिपाडा, पाटपाणी कृती समीतीचे रावसाहेबजी गाढवे,बाबासाहेब गोरे,नरेंद्र पिपाडा,ज्ञानेश्वर चौधरी,राजुशेठ मुनावत,दिलीप क्षिरसागर,सुरेश नाबरिया,नेमिचंद लोढा, डॉ.संतोष भवर, महावीर पिपाडा,पारस पिपाडा, गणेशशेठ भळगटीया, बबनराव घोरपडे,जयाभाऊ काले,जनार्दन गाढवे,शिवाजी सोनवणे,संदिप भळगट,अरुण संकलेचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुखराजजी पिपाडा यांच्या सामाजिक,आर्थिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. आपल्या मनोगतात भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले की, “पुखराजजी पिपाडा हे केवळ समाजासाठीच नव्हे तर इतर समाजातील सर्वसामान्य माणसांच्या अडचणींना धावून जाणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी गुरुदेव दत्त पतसंस्था अत्यंत प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे व दूरदृष्टीने चालवत अनेक कुटुंबांना आर्थिक आधार दिला आहे. पतसंस्थेच्या माध्यमातुन गोरगरिबांचे प्रपंच उभे केले. त्यांच्या कार्यामुळे समाजात विश्वास, आपुलकी आणि सेवाभावाची भावना अधिक बळकट झाली आहे.”
डॉ. राजेंद्र पिपाडा पुढे म्हणाले की, “समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून पुखराजजींनी आयुष्यभर कार्य केले. कोणाचे सुख असो वा दुःख, ते प्रत्येक प्रसंगी मनापासून सहभागी होतात. त्यांच्या शांत, प्रेमळ, संयमी आणि साधेपणाने भारलेल्या स्वभावामुळे समाजात त्यांना विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. ‘साधी राहणी आणि उच्च विचार’ या तत्वाचे ते खऱ्या अर्थाने जिवंत उदाहरण आहेत.”
गुरुदेव दत्त पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, छोटे व्यापारी व सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक मदत उपलब्ध करून देत सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. शेती व ग्रामीण जीवनाशी त्यांची असलेली नाळ आजही घट्ट असून शेतकऱ्यांच्या समस्या ते अत्यंत जवळून समजून घेतात. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता आणि आदराची भावना आहे. कार्यक्रमादरम्यान पुखराजजी पिपाडा यांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या दीर्घ सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भविष्यातही समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.




















