*साहित्य, संस्कृतीच्या वारशाने सहकाराची चळवळ समृद्ध बनवू -उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार*.

शिर्डी, दि. २७(उमाका) प्रवरानगर हे सहकार चळवळीचे प्रेरणास्थान आहे. ग्राम विकासाचा आदर्श मॉडेल म्हणून प्रवरा मॉडेल हे देशात ओळखलं जाते. सामान्य माणसाला विकसित करण्याचे काम सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून केले. सहकार चळवळीला साहित्य व संस्कृतीच्या माध्यमातून समृद्ध बनवू असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी केले.
प्रवरानगर येथे धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त जीवनगौरव पुरस्काराच्या वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील.माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, आ. मोनिका राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. आशुतोष काळे, आ. विठ्ठलराव लंघे, आ. संग्राम जगताप, आ. अमोल खताळ, आ. प्राजक्त तनपुरे, माजी आमदार लहू कानडे, चंद्रशेखर कदम, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन चंद्रशेखर घुले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे-पाटील, चेअरमन डॉ. सुजय विखे-पाटील, सौ. शालिनीताई विखे-पाटील, ध्रुव विखे-पाटील, अविनाश आदिक, सौ. अनुराधा नागवडे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची उपस्थिती होती.
प्रवरानगर हे साखर उत्पादनाशिवाय शिक्षण रोजगार आणि ग्रामविकासाचे उत्तम मॉडेल असून येथे सामान्य माणसाला विकसित करण्याचे काम विठ्ठलराव विखे पाटील यांनी पाहिलेल स्वप्न पूर्ण होत आहे .तोच वारसा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात पुढे चालवला. जीवनगौरव पुरस्कार प्राप्त असणारे उत्तम कांबळे यांनी लिखाणातून दिशा देण्याचे काम केले आहे प्रतिभावंतांचा सन्मान प्रवरा नगरने केलेला आहे. सहकाराची ताकद मजबूत करण्यासाठी साहित्य संस्कृतीचा वारसा जपत समाजाला समृद्ध बनवण्याचे काम करू असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचे वितरण राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रस्ताविकामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची अखंड परंपरा सुरू असून आज राज्यभर शेतकरी दिन साजरा होत आहे हा त्यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचे आणि गौरवाची बाब आहे. पुरस्काराचे हे ३६वे वर्ष असून ही परंपरा सुरू आहे. असे सांगितले.
विठ्ठलराव विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक उत्तम कांबळे यांनी पुरस्काराच्या बाबत मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रवराच्या नदीकाठाने साखर कारखान्याबरोबर नवा माणूस तयार केला. समाज ,साहित्य संस्कृतीला बळ देणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने पुरस्कार मला प्राप्त झाला याबद्दल आनंद होत असून नैतिकतेवर राजकारणाचा पाया इथल्या मातीत आहे. साहित्यिकांच्या मागे समाज हितासाठी लिहिणाऱ्या लेखकांना पाठबळ अशा पुरस्कारातून मिळत असते .हा पुरस्कार समाजातील शोषित व्यक्तीला आवाज आणि चेहरा देण्यासाठी केलेल्या लिखाणाचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले . मला लेखक म्हणून समाजाने जे स्वीकारलं या पुरस्कारांची ऊर्जा म्हणून उपयोग होईल तसेच विठ्ठलराव विखे पाटील यांचा कार्य आणि वारसा समाजासमोर येण्यासाठी यावर चित्रपट आणि तसेच त्यांच्या कार्याचा गौरव ग्रंथ निर्माण करण्याची अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात विश्र्वास पाटील म्हणाले की, प्रवरानगर गुणग्राहकतेच महत्वपूर्ण ठिकाण असून अहिल्यानगर जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे. मराठी भाषा जाणीवपूर्वक शिकणे हे एक तंत्र आहे .मातृभाषेच्या माध्यमातून सुसंस्कृत आणि अधिक सर्वगुण संपन्न भावी पिढी निर्माण होत असते. मराठी ग्रंथालय आणि शाळा टिकल्या तर मराठी भाषा आपण वाचवू शकतो, सर्वांनी एकत्र येऊन याबाबत काम करणे आवश्यक असल्याचेही आवाहन विश्वास पाटील यांनी केले.
*मान्यवरचा सन्मान*
या वर्षी पुरस्कार निवड समितीने ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ उत्तम कांबळे याशिवाय ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ संहिता राजन विशेष साहित्य पुरस्कार’ सुरेंद्र दरेकर , राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार’ तमाशा कलेतील सेवेबद्दल मालती इनामदार , नाट्यसेवा मधील पुरस्कार’ सचिन शिंदे समाजप्रबोधन साठी मराठी अभ्यास परिषद (पुणे) या संस्थेस,तर जिल्हा साहित्य पुरस्कार’ निवृत्ती जोरी ,संगमनेर आणि प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार’ संजय गोर्डे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते ‘लढत’ इतर अन्य पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुजय विखे पाटील यांनी केले.




















