
प्रामाणिकपणाचा प्रेरणादायी आदर्श : साईभक्ताच्या सतर्कतेमुळे ₹१५,४१० ची पर्स मालकाला सुखरूप परत
श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागाने आजवर ₹८५ लाखांहून अधिक किमतीच्या हरवलेल्या वस्तू परत करून जपला भक्तांच्या विश्वासाचा ठेवा
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. श्रद्धा आणि भक्तीभावाने ते साईचरणी आपली सेवा अर्पण करतात. या भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुखद दर्शन मिळावे, तसेच त्यांच्या मालमत्तेचीही संपूर्ण सुरक्षितता राखली जावी, यासाठी श्री साईबाबा संस्थानचा संरक्षण विभाग अहोरात्र कार्यरत आहे. हरवलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या त्यांच्या मूळ मालकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्याच्या कार्यातून संरक्षण विभागाने सेवाभाव, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेचा एक अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे.
आजपर्यंत संरक्षण विभागाने सुमारे ₹८५ लाखांहून अधिक किमतीची रोख रक्कम, दागिने, महिलांच्या पर्स, मोबाईल, घड्याळे तसेच इतर मौल्यवान वस्तू संबंधित साईभक्तांना सुरक्षितपणे परत केल्या आहेत. संरक्षण विभागाच्या या उल्लेखनीय कार्याची विविध प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी दखल घेत त्यांचे कौतुकही केले आहे.
सध्या शिर्डीत गुरुपौर्णिमा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून उद्यापासून महोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अशा गर्दीच्या वातावरणातही आज प्रामाणिकपणाचा एक प्रेरणादायी प्रसंग घडला.
आज श्री साईबाबा मंदिरातील पारायण कक्षात पारायण करत असताना सौ. अनुपमा निरंजन (रा. बेंगळुरू) यांना एक पर्स आढळून आली. सदर पर्समध्ये ₹१५,४१०/- रोख रक्कम तसेच आधार कार्ड होते. कोणताही मोह न बाळगता त्यांनी ती पर्स तत्काळ श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.
संरक्षण विभागाने पर्समधील आधार कार्डच्या आधारे चौकशी करून ती श्री जी. व्ही. राजू (रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांची असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर मंदिर परिसरात उद्घोषणा करून संबंधित साईभक्तांना संरक्षण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. काही वेळातच श्री. राजू संरक्षण कार्यालयात आले. आवश्यक पडताळणी पूर्ण करून त्यांना त्यांची पर्स आणि त्यातील ₹१५,४१०/- रोख रक्कम सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आली.
एका साईभक्ताने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे दुसऱ्या साईभक्ताला त्याची हरवलेली रक्कम परत मिळाली. श्रद्धा, सचोटी आणि मानवतेचा हा सुंदर संगम साईबाबांच्या शिकवणीचा जिवंत अनुभव देणारा ठरला.
सौ. अनुपमा निरंजन यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा व तत्परतेमुळे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार करून विशेष अभिनंदन केले.
संरक्षण विभाग प्रमुख श्री. रोहिदास माळी यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मंदिर परिसर, भक्तनिवास आणि संस्थानच्या विविध ठिकाणी सापडलेल्या हरवलेल्या वस्तू त्यांच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचा प्रत्येक कर्मचारी साईभक्तांना सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी समर्पित भावनेने सेवा बजावत आहे.
“साईसेवा व मानवसेवा” या ब्रीदवाक्याला साजेशी ही घटना केवळ हरवलेली पर्स परत मिळाल्याची नसून, श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि विश्वास यांचे जतन करणाऱ्या श्री साईबाबा संस्थानच्या सेवाभावी कार्याचा आणखी एक प्रेरणादायी अध्याय ठरली आहे.




















